नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मी अर्थमंत्रालयात नको होतो. त्यामुळे माझी बदली इतर विभागात करण्यात आली. त्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेतली असे माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटले आहे.
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अर्थशास्त्रातील ज्ञान जास्त सखोल होते. त्यांच्याबरोबर आपण योग्य पद्धतीने काम करू शकलो. मात्र, सीतारामन यांची अर्थमंत्रिपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे आणि आपले मतभेद वाढत गेले, असे गर्ग यांनी सांगितले. गर्ग यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास अर्थमंत्रालय किंवा सीतारामन यांच्या कार्यालयाने नकार दिला.
सीतारामन यांच्यासोबत आपले कामकाजाबाबत मतभेद झाले. त्यांची माझ्याबद्दल पूर्वग्रहदूषित मते होती. त्यांना माझ्याबद्दल विश्वास नव्हता. रिझर्व्ह बॅंकेकडील अतिरिक्त रक्कम सरकारला लाभांश म्हणून द्यावी का, त्याचबरोबर बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या कामकाजाबाबत आपले आणि सीतारामन यांच्याबरोबरचे मतभेद वाढत गेले.
आपली इतर विभागात बदली केली जावी याबाबत सीताराम यांनी आग्रह केला होता. भारत सरकारने अर्थव्यवस्था 2030 मध्ये 10 लाख कोटी डॉलरची करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य वाटत नाही.
आपण या बाबी त्यावेळी पंतप्रधान कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांच्या कानावर टाकल्या होत्या. आपल्याला इतरत्र काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मात्र, आपण स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, असे गर्गे यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.