नगर – वेळोवेळी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा प्रशासनाला सूचना देऊनही काम सुरू न केल्यामुळे सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गुलमोहर, पाइपलाइन, तारकपूर, शीला विहार या रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपाच्या माध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. शहर विकास कामासाठी निधी आणण्यासाठी खूप कसरत करावी लागते. परंतु मनपाचे झोपलेले प्रशासन संत गतीने कारभार करत आहे. सदर रस्त्याची कामे मंजूर होऊन जवळपास पाच ते सहा महिने होऊ गेली तरी रस्त्याचे काम सुरू झाले नाही.रस्त्यावरील अतिक्रमणे काढली असून काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवली आहेत. या खड्ड्यामुळे व उडणारे धुळीमुळे नागरिक त्रस्त झाली आहेत. पाच ते सहा महिन्यांपासून प्रशासनाच्या वेळ काढूपणामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळाली नसल्यामुळे सावेडी उपनगरातील नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
वेळोवेळी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा प्रशासनाला सूचना देऊनही काम सुरू न केल्यामुळे सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी आयुक्त कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी नगरसेवकांनी नगररचना विभाग, बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे रस्त्याची कामे निधी असूनही वेळेवर पूर्ण होत नाही. जोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आम्ही नगरसेवक हे आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला.
आयुक्त शंकर गोरे यांनी येत्या दोन दिवसात या सर्व रस्त्यांची कामे सुरू होऊन दर्जेदार कामे केली जातील. मार्च 2023 पर्यंत सर्व रस्त्याची कामे पूर्ण होतील. रुंदीकरणासहित ही कामे केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. विरोधी मनपा पक्षनेता संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, तायगा शिंदे, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, बाळासाहेब बारस्कर, सतीश शिंदे, बापू जानवे आदी उपस्थित होते.