नारायणगाव – अष्टविनायक रस्त्यात कोल्हेमळा ते पुनम हॉटेल चौकापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना सरकारकडून मोबदला न मिळाल्याने अष्टविनायक रस्ता बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसे निवेदन नारायणगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. यावेळी शिवाजी गायकवाड, ऍड. राजेंद्र कोल्हे, अमित औटी व शेतकरी उपस्थित होते.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कोल्हेमळा ते पुनम हॉटेल या अष्टविनायक रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून, त्या जमिनीचा आजपर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. या संदर्भात 1978 पासून पीडब्ल्यूडी व शासन दरबारी शेतकऱ्यांचा पाठपुरावा चालू आहे; परंतु 42 वर्षानंतरही शासन जमिनीचा मोबदला न देता उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबतीत काही तरतूद होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
कोल्हेमळा ते पूनम चौक या परिसरातून गेलेला अष्टविनायक रस्ता हा शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीतून गेला आहे. रस्त्याच्या मध्यापर्यंत सात-बारावर नोंदी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन रस्त्याचे काम करणे आवश्यक होते;
परंतु संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी व ठेकेदार यांनी रात्री-अपरात्री शेतजमिनीत चाळीस फुटापर्यंत बळजबरी अतिक्रमण करून रस्त्याचे रुंदीकरण केले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत जर काही ठोस मार्ग निघाला नाही तर बाधित शेतकरी अष्टविनायक रस्ता बंद करतील, असे निवेदन शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिले आहे.
कोल्हे मळ्यातील शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. अर्जाची चौकशी करून दिवाणी अथवा फौजदारी यापैकी जी कारवाई योग्य आहे, ती केली जाईल. -पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक, नारायणगाव
सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिलेल्या लांबी व रुंदीनुसार आम्ही रस्त्याचे काम केले आहे. हा रस्ता 25 वर्षापेक्षा जास्त जुना आहे. रस्त्याचे काम कधी एका दिवसात होत नाही. रात्रंदिवस रस्त्याचे काम करण्याची परवानगी आम्हाला दिलेली असते. – सोपान बेल्हेकर, ठेकेदार