नवी दिल्ली – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्यावर बसलेला सिल्व्हर क्वीनचा शिक्का पुसण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
देशाची मातब्बर खेळाडू सायना नेहवालकडून फुलराणीचा किताब काढून सिंधूने आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये दबदबा निर्माण केला आहे. तसेच तिने या स्तरावरचा चीन, कोरिया, इंडोनेशिया, तैवान या देशांचे वर्चस्व कमी करण्याची किमयाही केली. मात्र, महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठूनदेखील सुवर्णपदक पटकावण्यात अपयश आले. त्यामुळे तिच्यावर केवळ रजतपदक (सिल्व्हर क्वीन) मिळवणारी खेळाडू असा शिक्का बसला आहे.
शांघाय, कोरियन, इंडोनेशियन तसेच जागतिक स्तरावर होत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिला सुवर्णयश मिळविण्यात अपयश आले आहे. देशातील अनेक तज्ज्ञ व समीक्षकांनी तिच्या खेळाचे कौतुक केले असले तरीही तिच्या खेळात अंतिम सामन्यातील चोकरचा ठपका राहतो, असे सांगत तिच्या खेळात सुधारणा तसेच मानसिक सक्षमता येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.
ही सातत्याने होणारी टीका सिंधूने आजवर पचवली. मात्र, आता या टीकांना प्रत्यक्ष कामगिरीनेच उत्तर देण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. गेल्या मोसमात जरी अनेक स्पर्धांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला असला तरीही मी मानसिकरित्या सक्षम आहे. आता करोनामुळे सराव पूर्वीसारखा करता येत नसला तरीही जेव्हा हा धोका संपुष्टात येईल त्यावेळी पूर्णक्षमतेने सराव करणार असून टोकियोत ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दुष्काळ निश्चितच संपवेन, असेही तिने सांगितले.
सायनाकडूनच प्रेरणा मिळाली…
फुलराणी सायना नेहवाल ही बलाढ्य खेळाडू असून आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. तिच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे तिची कामगिरी हाच माझ्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आदर्श आहे, असे सिंधू म्हणाली.