मुंबई – पुणे शहरात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धे नांदेडचं प्रतिनिधीत्व करणारा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवून विजय मिळवला. मात्र ही स्पर्धा संपल्यानंतर आता एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे.
या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख याची पैलवान महेंद्र गायकवाड याच्यासोबत कुस्ती झाली होती. आणि या स्पर्धेत सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी चर्चांना उधाण आले आहे. ‘माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय’, असेही सिकंदर शेख याने म्हटले आहे.
दरम्यान, आता या दोघांमधील वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीत अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सांगलीत लवकरच मातीतील कुस्ती होणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
संजय भोकरे वस्ताद यांनी या कुस्तीचा पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात सुरू झालेल्या कुस्तीच्या वादावर पडदा टाकण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पैलवान सिकंदर शेख याने तयारी दर्शवली असून महेंद्र यांच्याशी बोलणी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.