अरुण गोखले
माणसाने आपल्या मनातील देवत्वाच्या कल्पनेला छान सुंदर अशी रूपे दिली. ती रूपे नंतर त्याने आपल्या हस्तकौशल्यातून विविध माध्यमांच्या मूर्तींतून साकार केली. त्यांची लहान मोठ्या मंदिरांमध्ये स्थापना केली. त्यामधूनच सर्वत्र विविध देवदेवतांची मंदिरे तयार झाली.
पण आपण जेव्हा एखाद्या पुरातन शिवमंदिरात जातो तेव्हा आपल्याला तिथे शिवशंकरांच्या मूर्तीचे नव्हे तर शिवलिंगांचे दर्शन घडते. अशी शिवलिंगे ही प्रामुख्याने काळ्या रंगाच्या दगडांची असतात. त्यावर तांबे पितळेचा, पंचधातूंचा किंवा अगदी सोन्या-चांदीचा फणा धरलेला नाग असतो. जवळच त्रिशूळ, त्यावर डमरू अशा प्रातिनिधिक स्वरूपांच्या खुणांमधून आपल्याला शिवशंकराचे दर्शन घडते.
थोर शिवोपासक ऋषी, मुनी, योगी आणि सिद्ध साधक व अभ्यासक ह्यांच्याकडून असे सांगितले जाते की, हिमालयाच्या एका गुंफेमध्ये एक नीलवर्णीय ज्योत सदैव तेवत आहे. त्या मूळ ज्योतीचे दर्शन थोर साधक, उपासक, सिद्ध योगी ह्यांना त्यांच्या उपासना काळात ज्या बारा शिवलिंगांच्या स्थानी झाले, त्या स्थानास “ज्योतिर्लिंग’ असे म्हणतात.
भारतात अशी एकूण बारा ज्योतिर्लिंगे असून ती विविध राज्यांत विखुरलेली आहेत. त्यातील आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे बारा पैकी पाच ज्योतिर्लिंगे आहेत. त्या पाच स्थानांची नावे पुढील प्रमाणे- त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ आणि परळी वैजनाथ. मध्य प्रदेशात दोन ज्योतिर्लिंगे असून त्यांची नावे महांकाळेश्वर आणि ओंकार मल्लेश्वर अशी आहेत. उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वर, उत्तरांचलमधील केदारनाथ, आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम, तामिळनाडूतील रामेश्वर आणि गुजरातमधील सोरटी सोमनाथ अशी ही एकूण बारा ज्योतिर्लिंगे आपल्या भारतात आहेत.
या पवित्र आणि पुरातन ज्योतिर्लिंगे असलेल्या स्थानी आपल्याला भव्य शिवमंदिरे पाहावयास मिळतात. ही मंदिरे म्हणजे शिल्पकलेचे देखणे नमुने आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगांचे स्थान माहात्म्य हे वेगवेगळे असून त्या संदर्भातील कथा आपल्याला अनेक ग्रंथांतून, पोथ्या पुराणातून वाचायला मिळतात. आपल्या संस्कृतीत ह्या ज्योतिर्लिंगांना फार महत्त्व आहे. या ज्योतिर्लिंगांचे वर्णन करणारा पुण्यदायक श्लोक आहे. या श्लोकात असे नमूद केलेले आहे की, जो कोणी मनुष्य या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेईल त्याच्यावर भगवान शिवशंकराची निरंतर कृपा राहील.