हिमांशू
बदलाच्या गप्पा मारून झाल्या असतील तर आपण थोडंसं वास्तवाकडे वळूया का? बदलासाठी खरोखर पोषक वातावरण सध्या आहे हे मान्य; परंतु बदल कशासाठी घडवायचा हे स्पष्ट असायला हवं. अर्थातच, बदल आधी मेंदूत व्हावा लागतो; मानसिकतेत व्हावा लागतो. करोनाच्या जागतिक संसर्गानंतर संपूर्ण जग बदलून जाणार, असं सगळेच सांगत असले तरी नेमकं काय घडणार हे कुणीच सांगत नाहीये. फारतर काम करण्याच्या पद्धती बदलणार, शिक्षणाच्या पद्धती बदलणार वगैरे गोष्टी लोक सांगू शकतात.
पण हा बदल किती टक्के लोकांसाठी असणार? मुख्य म्हणजे इतरांसाठी नव्या जगात काही असणार की नाही? या प्रश्नांची उत्तरं देणं, किमान ते प्रश्न विचारणं ही कुणीच आपली जबाबदारी मानत नाही. या इतरांमध्ये कामगार कायद्यातल्या संभाव्य बदलामुळे पिचणारे श्रमिक जसे येतात, तसेच या जगातले मानवेतर सजीवही येतात.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जलस्रोत स्वच्छ होऊ लागले. आकाश निरभ्र झालं. हवेचं प्रदूषण कमी झालं. मानवाची हालचाल थांबली आणि इतर सजीवांची हालचाल वाढली. या बदलांचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ, घाबरून घरात बसलेल्या तुम्ही-आम्ही एकमेकांना पाठवले. “हे असंच कायम राहायला हवं’ अशा चर्चा झाल्या. आपण या निसर्गाचे केवळ एक अंश आहोत, याचं भान वाढतंय असं वाटू लागलं आणि तेवढ्यात घात झाला…
अननसातून फटाक्याची दारू देऊन ठार मारलेल्या हत्तिणीची कहाणी देशभर पसरली आणि आपण मूळ स्वभाव सोडणार नाही, हे स्पष्ट झालं. केरळमधील या घटनेपाठोपाठ आता रशियातून आलेली बातमी तर डोक्यात जाणारी आणि “माणूस’ म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. “सिम्बा’ म्हटलं की बच्चेकंपनीला कार्टूनमधला गोंडस छावा आठवतो आणि तरुणांना रणवीरसिंह आठवतो. परंतु रशियातला “सिम्बा’ हा खराखुरा छावा असून, त्याला भोगाव्या लागलेल्या क्रौर्याची दखल अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही घ्यावी लागलीय.
पर्यटकांना “सिम्बा’समवेत “सेल्फी’ काढता यावी म्हणून त्याचे दोन पाय निकामी केल्याची ही धक्कादायक घटना आहे. “सिम्बा’च्या मणक्यांनाही गंभीर दुखापत झाल्याचं दिसून आलंय. त्याच्यावर उपचार सुरू असले तरी प्रकृतीत फारशी सुधारणा नसल्याचं सांगण्यात येतंय. मुळात जन्मानंतर काही आठवड्यांतच “सिम्बा’ला त्याच्या आईपासून वेगळं केलं होतं. त्याचे पाय निकामी झाल्याचं जेव्हा वन्यजीवप्रेमींच्या लक्षात आले तेव्हा इतर माहिती गोळा करायला सुरुवात झाली. “सिम्बा’ला बरेच दिवस उपाशी ठेवल्याचंही आढळून आलंय. पर्यटकांना पाहून “सिम्बा’ पळून जाऊ नये यासाठी हा खटाटोप केला गेलाय. पुतीन यांनी आता घटनेच्या चौकशीचे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
जगात पैसा वाढला तसं पर्यटन वाढलं आणि पर्यटनातून पुन्हा पैसा वाढला. आज पर्यटन हा असंख्य लोकांना रोजगार देणारा एक उद्योग ठरलाय. पण ज्या आधारावर तो चाललाय, त्या निसर्गाच्या नरडीला नख लावताना आपल्याला बिलकूल शरम वाटत नाही. त्यातच “सेल्फी’चा घाणेरडा प्रकार जोमात असल्यामुळे निसर्ग पाहण्यापेक्षा निसर्गात “स्वतःला’ पाहण्याची सवय जडलीय. पण प्राण्यांसोबत “सेल्फी’ काढता यावी म्हणून त्यांची हाडं मोडली जात असतील, तर मामला गंभीर आहे.