नवी दिल्ली – करोना विषाणू हा उष्ण आणि कोरड्या पृष्ठभागावर कमी काळ टिकाव धरू शकतो, असा निष्कर्श मुंबईतील “आयआयटी’च्या संशोधकांनी काढला आहे. या निष्कर्शाचा उपयोग करून सार्वजनिक ठिकाणच्या निर्जंतुकीकरणाच्या सूचना आता जगभर दिल्या जाव्यात, असे मतही या संशोधकांनी मांडले आहे. “जर्नल फिजिक्स् ऑफ फ्ल्युईड’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये याबाबतचा निबंध प्रसिद्ध झाला आहे. एखाद्या व्यक्ती्ला शिंक आली, तर त्यानंतर किती काळापर्यंत हा विषाणू जिवंत राहू शकतो याचे विवेचन या निबंधामध्ये करण्यात आले आहे.
रजनीश भारद्वाज आणि अमित अगरवाल या “आयआयटी’तील विद्यार्थ्यांनी जगातील सहा देशातील पहाणीचा आधार घेतला. खोकला किंवा शिंकेनंतर पडणारे रुग्णाच्या घशातील स्रावाचे थेंब किती वेळात कोरडे पडतात, याचे हे निरीक्षण होते. हे थेंब कोरडे झाल्यावर विषाणू निष्क्रीय होतो. त्याच्या आधारे पृष्ठभाग कसा असल्यास हे थेंब असलेली जागा किती वेळात कोरडी होऊ शकेल, याचे निरीक्षण या संशोधकांनी केले आहे. त्यासाठी गणितीय मॉडेलचा उपयोग केला गेला.
अधिक तापमानात हे स्राव लवकर कोरडे होतात. आर्द हवामानात स्राव कोरडे होण्यास वेळ लागतो, असे अनुमान निरीक्षणाअंती काढले गेले. यासाठी न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजेलिस, मियामी, सिडनी आणि सिंगापूर या सहा शहरातील संकलित माहितीचा उपयोग केला गेला आहे.