कराडमधील स्थिती; रिक्षा थांबे, हातगाड्यांसह बरीच वर्दळ
सुरेश डुबल
कराड – वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सिग्नल यंत्रणा आवश्यक असते. मात्र याच सिग्नल भोवती वर्दळ वाढली तर वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी ती वाढते. अशी स्थिती सध्या कराडमधील सिग्नलची निर्माण झालेली आहे. वाढती झुडपे, सिग्नल भोवती असलेले हातगाडे, रिक्षांचे थांबे या सर्वांमुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी असलेले सिग्नलच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत.
कराड शहर हे व्यापारी दृष्ट्या प्रगत असल्याने रोज हजारो वाहने शहरात ये-जा करत असतात. त्यात शहरातील वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी न व्हावी तसेच वाहनधारकांना प्रवास करताना अडचण न यावी, यासाठी सिग्नलची आवश्यकता लक्षात घेऊन सिग्नलची उभारणी झाली. शहरातील कर्मवीर पुतळा, विजय दिवस चौक, उपजिल्हा रुग्णालय समोरील चौक, कृष्णा नाका, तसेच भेदा चौक, पोपटभाई चौक याठिकाणी पालिकेने सिग्नल यंत्रणा उभारली. मात्र नव्याचे नऊ दिवस, याप्रमाणे सुरुवातीच्या काही महिन्यात याचा परिणाम दिसून आला. शिस्तबद्ध वाहतूक शहरात सुरु झाली. मात्र जसजसे दिवस पलटत गेले, तस-तसे शहरातील वाहतुकीवर सिग्नलचा काहीही परिणाम होत नसल्याचे जाणवू लागले. याचे मुख्य कारण सिग्नलच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले होते व आहेत. पालिकेने अधून मधून या सिग्नल भोवती असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र ती कारवाई नेहमीच दिखाव्याची कारवाई ठरल्याचा इतिहास आहे. पालिका कारवाई करते, अतिक्रमण काढते व पुन्हा दोन दिवसात आहे अशी अतिक्रमणे लागून जातात. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका वाहनधारकांना बसत आहे.
बस स्थानक परिसरात असणाऱ्या कर्मवीर भाऊराव चौकामध्ये सिग्नल सुविधा सर्वात जास्त अतिक्रमणात अडकलेली आहे. येथे सिग्नल भोवती रिक्षा थांबे, वडाप थांबे, फळविक्रेते व हातगाडा धारक यांचे बस्तान बसलेले आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या समोरील बाजूस असलेल्या सिग्नलचा खांब हा पूर्णपणे झुडपात गेल्याने, सिग्नल चालू आहे की, बंद हे पलिकडील वाहनधारकांना समजत नाही. परगावाहून येणारे वडाप व रिक्षा चालक हे सिग्नल लाच थांबून प्रवासी उतरत असतात. त्यामुळे सहाजिकच पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. उपजिल्हा रुग्णालयासमोरील सिग्नल जवळ चर काढली असल्याने तेथेही वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. नगरपालिकेने शहरातील सिग्नल अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना मुक्त करावे, अशी सर्वसामान्य वाहनचालकांची अपेक्षा आहे. जेणेकरून सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडी काही प्रमाणात तरी व्यवस्थित होईल.
100 फुटांमध्येच जास्त अतिक्रमण
ज्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे. त्या चौकातील साधारणतः 100 फूट परिसर हा मोकळा असावा लागतो. येथे रिक्षा स्टॉप किंवा अन्य कोणतेही कायमचे अतिक्रमण नसावे. तसेच सिग्नल वरील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग ते पट्टे मारणे आवश्यक असते. यासाठी नगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे असते. कराडमध्ये मात्र 100 फूट काय तर सिग्नलला खेटूनच हातगाडीधारक, रिक्षा थांबे तयार झालेले आहेत. तसेच झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे देखील मुजलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नेमके कुठे उभे राहावे? हा प्रश्न सतावत असतो.