नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते नवज्योत सिध्दू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा अखेर परत घेतला आहे. मात्र, नवीन अटार्नी जनरलची नियुक्ती होईपर्यंत ते पदभार स्वीकारणार नसल्याची अट सुध्दा त्यांनी ठेवली आहे.
राजीनामा परत घेण्याची घोषणा करताना सिध्दू म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागे वैयक्तिक अहंकार नसून पंजाबच्या भल्यासाठी दिला होता. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याशी कोणत्याही प्रकारचे मतभेद असल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले. मुख्यमंत्र्यांशी नियमित चर्चा सुरू असून अनेक बैठका सुध्दा झाल्या आहेत, असेही सिध्दू यावेळी म्हणाले.
सिध्दू म्हणाले की, पंजबाचे सरकार हे 90 दिवसाचे सरकार आहे. यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. यातील 50 दिवस संपले आहेत. उरलेल्या दिवसांत पंजाबचे जेवढे भले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांशी नियमित चर्चा होत असते आणि ती राज्याच्या विकासाची असते. वैयक्तिक चर्चा करीत नाही. मी पंजाबसाठी उभा आहे. पंजाब माझी आत्मा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी एपीएस देओल यांची महाधिवक्तापदी निवड केली होती. यामुळे नाराज सिध्दू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. देओल यांनी 1 नोव्हेंबर रोजी महाधिवक्तापदाचा राजीनामा दिला आहे.