पुणे – नव्या वर्षात नव्या संकल्पना आणि महत्वकांक्षांना बहर येतो. एकीकडे गड-किल्ल्यांवर, धबधब्यांवर दारुच्या बाटल्या घेऊन जाणारी तरुणाई आणि दुसरीकडे विविध माध्यमांमधून गड-किल्ल्यांच्या पावित्र्याबद्दल, अस्तित्वाबद्दल, इतिहासाबद्दल, सौंदर्याबद्दल जाणीव निर्मिती होऊन त्यांचे जतन करू इच्छिणारी कात्रज येथील सिद्धीविनायक ग्रुप मधील तरुणाई अशा उघड दोन बाजू या नव वर्षाच्या निमित्ताने समोर येतात.
आठवड्याचे इतर दिवस फॉर्मल कपड्यांमध्ये, शूजमध्ये वावरणारे हे तरुण नव वर्षाच्या पहिल्या दिवशी हातात हँन्डगोल्ज, कापडी पिशव्या, फावडी घेऊन बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा सांभाळला जाईल याबद्दल शंका नाही.
गेल्या कित्येक वर्ष नव वर्षानिमित्त गड किल्ल्यावर जाऊन हे तरुण स्वच्छता अभियान राबवित आहेत. आतापर्यंत राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर अशा अनेक किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतलेल्या सिद्धीविनायक ग्रुपच्या वतीने या वर्षी लोणावळा येथील विसापूर किल्याच्या स्वच्छता मोहीम हाती घेतली.
या स्वच्छता मोहीमेत रोहन पवार, अक्षय चव्हाण, कार्तिक असबे, ओम खुंटले, अथर्व तावरे सहभागी झाले होते. जनहित फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीविनायक ग्रुप अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतो.
राज्यातील किल्ले आज जिर्ण अवस्थेत आहेत. ज्या किल्ल्यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे म्हणत आपण मिरवतो, दगडांच्या देशा म्हणत ज्या इतिहासामुळे आपण पेटून उठतो त्या किल्ल्यांची माहितीही आजकालच्या तरुणांना नसते. त्यामुळे युवकांमध्ये जनजागृती वाढावी म्हणून सालाबादप्रमाणे याही वर्षी किल्ले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली, अशी माहिती सिद्धीविनायक ग्रुपचे सुरज बरदाडे यांनी दिली.