– प्रसाद खेकाळे
“पुण्यात एमपीएससी आणि एकूणच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची अक्षरश: जत्रा भरायची. पण, गेल्या दीड-दोन वर्षांत करोना आणि लॉकडाऊन या कारणांनी ही मुलं गावाकडं गेली,’ हे असं साधं-सरळ चित्र आपल्यासमोर आहे. त्यामुळं एकूणच “एमपीएससी करणाऱ्या मुलांचं भवितव्य’ विषयाचं फारसं गांभीर्य वाटत नाही. पण, या मुलांच्या हाल-अपेष्टा, एखाद्या मार्कामुळं झालेला ध्येयभंग, यातल्या अनेक मुलांची गावाकडची परिस्थिती, पोटाला चिमटा देऊन दिवसरात्र एक करणारी मुलं, लग्नाचं वय होऊनही फक्त जिद्द म्हणून अभ्यास करणारी सावित्रीची एखादी लेक जेव्हा घरच्यांना एमपीएससीचं महत्त्व समजावून सांगते, तेव्हा मात्र गलबलून आल्याशिवाय राहत नाही.!
प्रशासनातील विविध रिक्त जागा एमपीएससीमार्फत भरण्यासाठी सरकारी अनास्था…हा या उमेदवारांच्या भवितव्यापुढचा सर्वांत मोठा “दगड’ आहे. एकवेळ दगडालाही पाझर फुटेल, पण तरुणांपुढचं संकट दूर करण्याची ताकद सरकारमध्ये उरलेली नाही. असंख्य होतकरू पदवीधर मुलं पुण्यात मोठ्या आशेनं येतात.
एखादी सरकारी पोस्ट मिळवून माय-बापाच्या कष्टांचं चीज करू, अशी चमक, जिद्द त्यांच्या डोळ्यांत असते. शहरात कोणत्यातरी संस्थेत-एजन्सीत पार्ट टाइम जॉब शोधत राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, बॅकिंग, पोस्ट, रेल्वे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती अशा सर्व परीक्षांच्या “आषाढी-कार्तिकी’च्या वाऱ्या हे पुजारी करतात. पण, अपुऱ्या जागा, उशिराने लागणारे निकाल, कधी-कधी न्यायालयाच्या फेऱ्यात अडकलेले निकाल, आणि अशा असंख्य अडचणींचा सामना करत ही मुलं तितक्याच जिद्दीनं पुन्हा पुढच्या परीक्षेची तयारी करतात.
एखाद्या परीक्षेचे 700 ते 1000 रुपयांची फी भरण्याचीदेखील काहींची ताकद नसते. अशावेळी फक्त एकवेळची “मेस’ लावत या मुलांनी खरंच दोन हात करण्याची तयारी केलेली असते. पण, प्रत्येकवेळी नशीब साथ देत नाही आणि पदरी निराशा पडते…
नवी पेठ, सदाशिव पेठ, पर्वती, नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरातील गल्लीबोळांत एखाद्या हॉस्टेल अथवा रूमवर राहून आपल्या भवितव्याचं स्वप्नं रंगवत अभ्यास करणारी असंख्य मुलं आज हताश आहेत. सरकारदरबारी या मुलांच्या कष्टाचं कोणतंही रेकॉर्ड नाही आणि आकडेवारी तर नाहीच नाही! दीड-दोन वर्षांतून कधीतरी एमपीएससीची जाहिरात येते. पण, त्या जागाही भरल्या जातील याची शाश्वती नसते.
त्यामुळं अनेकांच्या उमेदीची वर्षे वाया गेली आहेत. खासगी क्लासेसचे मोठ-मोठे होर्डिंग आणि त्यावरील यशस्वीतांचे फोटो पाहून या तरुणांना स्फूर्ती येते खरी, पण त्यातून क्लासेस संचालकांचे बॅंक अकाउंट गब्बर होत आहेत आणि पोरांच्या आयुष्याची माती झाली आहे, हेच या “रॅट रेस’चं अंतिम सत्य आहे. नाही म्हणायला, राज्यातून शे-दोनशे मुलं सरकारी सेवेत जातही असतील, पण बाकीच्यांचं काय?
स्पर्धा परीक्षांच्या नादाला लागून आज अनेक उमेदवारांची उमेदीचं वय निघून गेलं आहे. हातात असलेली डिग्री पणाला लावून ही मुलं स्पर्धा परीक्षांच्या नादात 5-7 वर्षे अभ्यासच करत बसतात. तोपर्यंत खासगी का होईना, पण नवी नोकरी मिळणंही कठीण झालेलं असतं.
मुलींची स्थिती तर त्याहूनही वाईट आहे. आई-वडिलांचा विरोध पत्करून “लग्न’ हा मुद्दा दुर्लक्षित करून अनेक मुली पुण्यात अभ्यासाला येतात. पण, पुन्हा सरकारी अनास्था आणि वर सांगितलेली परिस्थिती पाहून त्यादेखील पुन्हा घरच्यांचं ऐकतात आणि संसाराला लागतात. त्यांच्या इच्छा-आकांक्षा-जिद्द यांना कधीच मुठमाती मिळालेली असते.
हे इतकं सगळं लिहिण्याचं कारण काय, तर पुण्यात शनिवारी स्वप्निलनं आत्महत्या केली…नव्हे, सरकारी यंत्रणेशी झुंजताना तो “शहीद’ झाला आहे. सरकारी पोस्ट मिळवण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करणारा आणखी एक तरुण धारातीर्थी पडला आहे.
शासन आणि क्लासेसवाल्यांनी दाखवलेल्या आशेचा किरणही त्याला वाचवू शकलेला नाही. असे असंख्य स्वप्निल आज तुमच्या-आमच्यात आहेत. त्यांनी स्वत:हून वेळीच सावरलं पाहिजे. अन्यथा त्यांच्याही स्वप्नांची धूळ निश्चित आहे.