-अभिलाषा चांदोरकर
श्रावण आला की तो रसिक मनाला साद घालतो. खरंतर त्याने साद घालायचीही आवश्यकता नाही. त्याच्या आगमनाबरोबर रसिक मनाच्या लेखण्या, चित्रकारांचे ब्रश काम करायला लागतात. आपोआपच ते या मनभावन रूपाकडे आकर्षित होतात.
आपल्या संस्कृतीत सहा ऋतूंचे सहा सोहळे सांगितले आहेत. प्रत्येक ऋतूचं वैभव काही वेगळंच. शब्दवैभवांनी हे ऋतूंचं सौंदर्यवैभव साकारायला गेलं तर ते कधीच शक्य होणार नाही. पण अनेक शब्दप्रभूंनी हे वैभव चितारण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी कालिदासापासून ते मंगेश पाडगावकरांपर्यंत अनेक शब्दसम्राटांनी आपापल्या परीने ऋतूंचे हे सोहळे मनाच्या गाभाऱ्यातून मोकळे केले आहेत.
प्रत्येक सोहळ्याचं वेगळं वैभव असलं तरी “वर्षाऋतू’चं सौंदर्य काही आगळंच. साऱ्या ऋतूंची ही सम्राज्ञी तेवढ्याच दिमाखात येते आणि आपल्या अस्तित्वाचे मोहरे मागे ठेवून निघून जाते. तिच्या पाऊलखुणा धुंडाळताना पहिलं दर्शन होतं ते श्रावणाचं. त्याचं आगमन झालं की वर्षाराणी हजर होत असल्याची जाणीव होते. युगानुयुगं लोटली तरी श्रावणाचं आणि त्याच्या बरोबरीने येणाऱ्या वर्षाराणीचं कौतुक काही कमी झालेलं नाही. एखादा राजा जेवढ्या जल्लोषामध्ये दरबारात येतो त्याप्रमाणेच श्रावणही येतो.
आपल्या आगमनाने तो रसिकांना झपाटून टाकतो. श्रावणाच्या आगमनाबरोबर ज्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उमटत नाहीत तो रसिकच नव्हे. आज इतर गोष्टींबरोबरच निसर्गही बदलल्याच्या गप्पा अनेकजण करतात. पण श्रावण मात्र आपलं रूप तसंच ठेवून आहे. निसर्ग किती का बदलेना, पण आपण बदलायचं नाही असं जणू श्रावणाने ठरवूनच ठेवलेलं असावं.
सृष्टीचं सौंदर्य आणखीन वाढवण्याचं कसब त्याच्यामध्ये आहे. सृष्टीचं रूप कसं खुलवायचं हे त्याच्याकडूनच शिकावं. श्रावणराजा येताना त्याने सृष्टीसाठी हिरव्या शालूची भेट आणलेली असते. हा शालू तिने परिधान केला की, तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. साऱ्या सृष्टीत जणू हिरवाई पसरली आहे, असा भास होतो. श्रावणाने दिलेल्या नवलाईचं वर्णन करण्यासाठी शब्दांचा खजिनाही अपुरा पडावा. असंख्य आठवणींचा नजराणा घेऊन श्रावण येतो आणि अनेकांना घायाळही करतो.
बालपणीचा श्रावण, शाळेतला श्रावण, महाविद्यालयातला श्रावण, प्रौढ वयात भेटलेला श्रावण अशी कितीतरी रूपं मनाच्या कुपीतून बाहेर येऊ लागतात. कितीही वर्षे लोटली तरी या कुपीचा सुगंध कमी होत नाही. मनोदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हा सुगंध पुरेसा असतो. तरी आठवत राहतो तो तारुण्याच्या वाटेवर भेटलेला श्रावण.
या श्रावणाचं वर्णन काय करावं? ग्रीष्माची पानगळ केव्हाच थांबलेली असते. वसंताच्या वैभवाची रूपं सगळ्यांनीच अनुभवलेली असतात. यामुळे सृष्टीचं सौंदर्यवैभव बहरलेलं असतं. तरीही त्यामध्ये कोठेतरी अपुरेपणा असतो. तो भरून काढण्याचं काम श्रावण करतो. या श्रावणावर आजपर्यंत काय लिहिलं गेलं नाही? अन्य कोणत्याही ऋतूवर जेवढं लिहिलं गेलं नसेल एवढं श्रावणावर लिहिलं गेलं आहे. कथा, कविता, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून श्रावणाची विविध रूपं आपल्यासमोर आलेली असतात.
श्रावण म्हणजे मनाचे रेशमी बंध जोडणारा महिना. विविध सणांची भेट घेऊन हा सण येतो. नागपंचमीपासून राखीपौर्णिमेपर्यंत अनेक सणांची भेट त्यामध्ये असते. निसर्गाशीही कसं नातं जोडावं हे श्रावणाकडूनच शिकावं. त्यामुळेच “मनभावन हा श्रावण’ असं त्याचं वर्णन करायला हवं. श्रावणात सृष्टीला एवढं चैतन्य येतं मग मनाला का येणार नाही? श्रावणात मनाला नवी पालवी फुटते. एक नवा बहर येतो आणि श्रावणासारखंच मनही हिरवं होतं. म्हणूनच हा मनभावन श्रावण मनाच्या एका कप्प्यात ठाण मांडून बसलेला असतो.
तरुणाईच्या मोक्याच्या वळणावर मदरंगी श्रावण भेटला की या वळणाला एक वेगळीच रंगत येते. प्रियसखा असणाऱ्या श्रावणाच्या आगमनाबरोबरच जीवाच्या प्रियसख्याला किंवा सखीला भेटण्याची ओढ अनावर होते. श्रावण जसा वर्षाराणीच्या भेटीसाठी व्याकूळ होऊन आलेला असतो तसेच आपणही आपल्या जीवलगाला भेटावं हे काहूर प्रत्येकाच्या मनात गुंजन करू लागतं आणि श्रावणाच्या साक्षीने या भेटी होतातही. अन्य ऋतूत आपल्या जीवलगाला भेटण्यापेक्षा वर्षा ऋतूत भेटण्याची मौज काही आगळीच असते. त्यामुळे श्रावण हाही आपल्या जीवाचा सखा बनतो.
या ऋतूत सृष्टीला एक नवचैतन्य आलेलं असतं. तिचं रूप क्षणोक्षणी बदलत असतं. रिमझिम बरसणाऱ्या सरींनी श्रावण या रूपात आणखी भर घालत असतो. सारं आभाळ त्याचं आणि सृष्टीचं हे देखणं रूप निरखित असतं. त्यांच्या रूपाचं कौतुक करावंसं वाटलं की वरुणराजा रिमझिम सरींचा नजराणा त्यांच्यासाठी पाठवत असतो. श्रावणात फिरायला गेलेल्या ठिकाणी “ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ अशी गीतं ओठावर आली नाहीत तरच नवल. या बरव्या ऋतूशी कोणत्याही ऋतूची बरोबरी होणार नाही.
रिमझिमणाऱ्या या श्रावणात मनाच्या हिंदोळ्यावर असंख्य आठवणींचा झुला झुलू लागतो. त्यापैकी कोणती आठवण पकडून ठेवावी आणि कोणती सोडून द्यावी, असा प्रश्न आपल्याला पडतो.
एखाद्यावेळी याच श्रावणात कोणीतरी भेटल्याची आठवण असते तर कधी याच दिवसात कोणाचा तरी विरह झाल्याच्या आठवणीही असतात. या आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओलावतात. श्रावणातील रिमझिमणाऱ्या सरींप्रमाणेच आपल्याही डोळ्यातून सरी ओघळू लागतात आणि हे पाहायला श्रावणच आपल्यासमोर असतो. त्यामुळे तो अगदी जीवाभावाचा सखा बनतो. मनाच्या विकल अवस्थेत पाठीवरून हात फिरवणारा आणि उत्स्फूर्त अवस्थेत आपल्या आनंदात सहभागी असणारा श्रावणच असतो. त्यामुळेच त्याचं हे मनभावन रूप आपल्या डोळ्यासमोर कायमचं कोरलं गेलेलं असतं.