लखनौ – बसपा प्रमुख मायावती यांनी सोमवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारला फटकारले. लोकांना रोजगाराची हमी देऊन खरी देशभक्ती दाखवा अशी सुचना त्यांनी मोदी सरकारला केली आहे.
मायावती यांनी आरोप केला की आधी काँग्रेस आणि आता भाजपच्या नेतृत्वाखालील जातीयवादी, अहंकारी आणि समावेशक नसलेल्या सरकारांमुळे करोडो गरिबांच्या विकासावर परिणाम झाला आहे.त्यामुळे लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत जनहितासाठी आणि मागासलेल्या जातींच्या कल्याणासाठी समर्पित असलेल्या एका पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
एक्सवरील पोस्ट्सच्या मालिकेत मायावती म्हणाल्या, “नवीन वर्षापासून सरकारने केवळ ‘रोजगार हमी’ देऊन खरी देशभक्ती आणि ‘राजधर्म’ दाखवावा. कारण मोदी सरकारच्या हमी या फसव्या राजकारणाचा आणि संकुचित राष्ट्रवादाचा परिणाम असल्याचे सिद्ध झाले आहे असे त्यांनी नमूद केले आहे.
देशात माफक दरडोई उत्पन्न असेल, म्हणजे खर्च करण्यासाठी लोकांच्या खिशात पैसे नसतील तर विकासाचे बिगुल फुंकून काय उपयोग. शिवाय प्रचंड बेरोजगारांच्या मोठ्या फौजेमुळे ‘विकसित भारत’ कसा शक्य आहे? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.