नवी दिल्ली – बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री काही दिवसांत गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि राजकोट येथे भव्य दरबार भरवणार आहेत. परंतु हा दरबार आता वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे समजते. सुरतच्या एका व्यापाऱ्याने आता थेट धीरेंद्र शास्त्रींनाच आव्हान दिल आहे. या व्यापाऱ्याने चमत्कार दाखवून हिरे जिंकण्याचे चॅलेंज बाबांना दिले आहे.
धीरेंद्र शास्त्री हे आपल्या दरबाराद्वारे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवतात. याबाबतचे त्यांच्या दरबारातील अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झालेले आहेत. ज्यामध्ये शास्त्री संबंधित व्यक्तीची समस्या स्वतः ओळखून त्याचे निराकरण करताना दिसतात. यावरूनच आता एका हिरे व्यापाऱ्याने थेट शास्त्रींना चॅलेंज दिले आहे. या बाबतचे वृत्त एका हिंदी न्यूज वेब साईटने प्रसारित केले आहे.
हिरे व्यापार्याने चॅलेंज दिले की जर मला त्यांच्या दरबारात बोलावले गेले तर मी पॉलिश केलेल्या हिर्यांचे पाकीट घेऊन जाईन आणि जर त्यांनी मला सांगितले की त्यात किती पॉलिश केलेले हिरे आहेत तर मी ते हिर्यांचे पाकीट त्यांच्या चरणी अर्पण करेल. मी शरण जाऊन त्यांच्या दिव्य शक्तींचा स्वीकार करेल. शास्त्रींना आव्हान देणाऱ्या हिरे व्यापाऱ्याचे नाव जनक बाबरिया असं असून ते अंधश्रद्धा निर्मूलन कार्याशी संबंधित असल्याचे समजते.
22 तारखेपासून गुजरातमधील धीरेंद्र शास्त्री यांच्या दैवी दरबाराला विरोध करणार असल्याचे व्यावसायिकाने सांगितले. बागेश्वर सरकार उर्फ धीरेंद्र शास्त्री यांचा दिव्य दरबार सुरत येथे २६ आणि २७ मे रोजी होणार आहे. या दरबारात चमत्कार, अंधश्रद्धा आणि त्याची दैवी शक्ती सांगितली जाते, त्याला उघडपणे विरोध करणार असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.