मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री हे सतत चर्चेत असतात. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे.
त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. आपल्या कडे येणाऱ्या भाविकांचं ते मन वाचन करत असतात.
मात्र, आता बागेश्वर धाम यांचा दरबार महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भरणार असल्याचं सांगण्यात आलं असून याची तारीख देखील समोर आली आहे. पुढील महिन्यात म्हणजेच, 5, 6, 7 नोव्हेंबरमध्ये हा दरबार शहरात भरणार आहेत.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मध्यप्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. तसेच, बागेश्वर धाम यांना छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar) दरबार भरवण्याची विनंती केली होती.
त्यानंतर आता बागेश्वर धाम यांनी 5, 6, 7 नोव्हेंबरची तारीख दिली असल्याची माहिती कराड यांच्या कार्यालयातून कळवण्यात आली आहे. तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार आहे.
कोण आहेत धीरेंद्र शास्त्री आणि ते इतके लोकप्रिय कसे झाले ?
गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशात तांत्रिक आणि कथा सांगणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे, आणि 25 वर्षीय शास्त्री हे त्यापैकी एक आहेत. काही वर्षांपूर्वी ते ऑटोरिक्षाचालक होते, असा स्थानिकांचा दावा आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत बागेश्वर धाम हे एक छोटेसे मंदिर होते आणि मुख्यतः शास्त्रींनी केलेल्या चमत्कारांमुळे त्याची लोकप्रियता वाढली. अलीकडे या गावात रस्ते, भोजनालये, हॉटेल्स अशा अनेक मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.
‘संपूर्ण बालपण तपश्चर्येत गेले’
नुकतेच वृत्तवाहिनीशी बोलताना बागेश्वर पीठाधीश्वर म्हणाले की, मी तपस्वी नाही, माझे संपूर्ण बालपण तपश्चर्येत गेले. लहानपणापासून हनुमान चालिसाचे पठण केले. गुरुजींनी जे सांगितले ते अनुभवले. हनुमानजींच्या पायाशी बसून रडले. त्याचाच परिणाम म्हणजे आज सनातन धर्माचा झेंडा सर्वत्र गाडला जात आहे.