क्रेडाईची मुख्यमंत्री व रेल्वे मंत्रालयाकडे मदतीची मागणी
मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कामगार आपल्या खेड्यात परत गेले आहेत. ते अजूनही परत येण्यात अडथळे येत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी क्रेडाई या विकासकांच्या संघटनेने केली आहे.
75 टक्के कामगार अजूनही आपल्या गावी आहेत. त्यांना शहराकडे येण्याचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्र आणि इतर उद्योग पूर्वपदावर येण्यात अडथळे निर्माण होत आहेत. क्रेडाई आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले की, राज्यात या संघटनेचे 1800 सदस्य आहेत.
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामधून कामगार परत आलेले नाहीत. मार्च महिन्यापासून बांधकाम क्षेत्राचे काम ठप्प झाले आहे. कामगार उपलब्ध नसल्यामुळे हे काम अजूनही सुरू झालेले नाही. या प्रकल्पात भांडवल अडकले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नसल्यामुळे कच्चामाल उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यातच कामगाराच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.