सोमेश्वरनगर -बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागात बाजरी, ज्वारीबरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु यावर्षी पावसाने अनेक शेतकऱ्यांनी टाकलेले कांद्याचे बी, रोपे पावसाने खराब झाली आहेत. ही रोपे वाया गेल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बियाणांचा व रोपांचा तुटवडा जाणवत आहे.
बारामती तालुक्यातील पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, मोराळवाडी, मुर्टी परिसरात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी या भागात चांगल्या प्रमाणात पाऊसही झाला आहे. गर्वी व हळवी अशा दोन्ही प्रकारच्या कांदा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
अंदाजे अडीच हजार रुपये किलोप्रमाणे कांदा बियाणे खरेदी केली जात आहे. रोपांचा वाफा दीड ते दोन हजार रुपयांप्रमाणे शेतकरी विकत घेत असल्याची माहिती पळशी येथील शेतकऱ्यांनी दिली. गेल्यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला होता.
त्यामुळे यावर्षीही बाजारभाव चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. परंतु पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियाणे, कांदा वाया गेला आहे. त्यामुळे यंदा बियाणांचा तसेच कांद्याच्या रोपांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती शेतकरी बाळू कराडे यांनी दिली.