कॉंग्रेस प्रवक्ते तिवारी यांची मागणी
पुणे – जम्बो कोविड सेंटरची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही त्यांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही, हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्य सरकार निधी आणि आरोग्य अधिकारी देण्यापासून ते कोविड सेंटर उभे करण्यापर्यंत सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. परंतु, याचा लाभ सत्ताधारी भाजपला घेता आला नाही, असा तिवारी यांचा आरोप आहे.
जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीमध्ये अक्षम्य हेळसांड झाली असून, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, डॉक्टर्स, तज्ज्ञ स्टाफ नसतानाही हे सेंटर उभे करण्याची आणि रक्कम खर्ची टाकण्याची घाई यातून दिसून येते, पत्रकार पांडुरंग रायकर आणि माजी महापौर दत्ता एकबोटे यांना यंत्रणेतील त्रुटी आणि हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागला आहे. याची जबाबदारी आणि उत्तरदायित्त्व निश्चित करावे लागेल. त्यामुळे या प्रकरणाची निवृत्त सनदी अधिकारी किंवा निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे.