पुणे : ओंकारेश्वर घाटावर दशक्रीया व अन्य विधी करणाऱ्या गुरुजींचे विधींचे साहित्य चोरीला गेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे येथून शनिवार पेठ चौकी हाकेच्या अंतरावर आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, ओंकारेश्वर घाटावर दशक्रीया विधी व अन्य विधी करण्यात येतात. या घाटावर विधी करण्यासाठी पुणेकरांकडून प्राधान्य दिले जाते. यामुळे येथे विधींसाठी गुरुजींचा नेहमी राबता असतो. या घाटावर विधी करणारे गुरुजी एकत्र येऊन त्यांचे विधीसाठी लागणारे सर्व सामान घाटावरील एकत्र एका दुकानवजा जागेत ठेवतात. याला शटर असून त्याला नियमीत कुलूप लावले जाते.
आज सकाळी काही गुरुजी विधीसाठी घाटावर आले असता, त्यांना शटर उचकटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पहाणी केली असता, तेथून विधीचे सामान चोरीला गेल्याचे आढळले. येथून चांदी, तांबा व पितळाचे सुमारे 40 तांबे, 40 ताम्हण, पळी भांड्याचे 20 सेट, पराती पातेले, चांदीचा तांब्या, 3 भांडी, 2 ताम्हण चांदीचे आणि एक पळी, येवढे साहित्य चोरीस गेले आहे. याची किंमत 80 हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी शनिवार पेठ पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यासंदर्भात वैकुंठ परिवारातर्फे संदीप खर्डेकर यांनी ह्या चोरीचा तपास करावा तेथे सुरक्षेची व्यवस्था करावी व तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अश्या प्रकारांना आळा बसेल. हा प्रकार तिसऱ्यांदा घडत असून याबाबत गांभीर्याने तपास व्हावा अशी आग्रही मागणी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांना केली.