वर्षभरात 1400 नवजात बालकांचा मृत्यू
राज्यात 13 हजार बालकांच्या मृत्यूची नोंद
मुंबई (प्रतिनिधी) – नंदूरबार, मेळघाट, पालघर, जव्हार, मोखाडा आदी आदिवासी भागात सर्वाधिक बालमृत्यू होत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता प्रत्यक्षात देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 2018-19 या वर्षांत 1402 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक प्रयत्न सुरू असताना देखील राज्यात तब्बल 13 हजार 70 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
राज्यात नवजात बालकांच्या मृत्यूत झालेल्या वाढीसंदर्भात विधानसभेत आमदार मंगेश कुडाळकर, आशिष शेलार यांच्यासह अनेक सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
एचएमआयएसच्या अहवालानुसार राज्यात सन 2018-19 या काळात 2 लाख 11 हजार 772 बालकांचे वजन जन्मतःच अडीच किलो पेक्षा कमी असून मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची 22 हजार 179 बाळ जन्मली आहेत. तसेच याच कालावधीमध्ये 13 हजार 70 बालकांच्या मृत्यूंची नोंद झाली. या नोंदीमध्ये 1402 नवजात बालकांच्या मृत्यूंची नोंद मुंबई शहरात झाली आहे, असे टोपे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
याच अहवालानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 च्या कालावधीत राज्यात 12 हजार 147 अर्भक मृत्यू, 11 हजार 66 बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच 1 एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत 1 हजार 70 मातामृत्यू झालेले आहेत.