नवी दिल्ली : राजधानीत मार्चमध्ये विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा होणार आहे. करोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे चीनसह सहा देशांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीनसह तैवान, हाँगकाँग, मकाऊ, उत्तर कोरिया व तुर्कमेनिस्तान या देशांनी स्पर्धेतून माघार घेतल्याचे भारतीय रायफल महासंघाने कळविले आहे.
ही स्पर्धा १५ ते २६ मार्च या कालावधीत कर्णसिंग रेंजवर होणार आहे. विविध देशांचे संघ या स्पर्धेसाठी भारतात येत आहेत. मात्र, त्यांनाही करोनाबाबत अत्यंत योग्य दक्षता घेण्याची विनंती केली असून या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंना याची लागण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.
आपला संघ न पाठविण्याचा योग्य निर्णय चीनने घेतला आहे. त्यामुळे इतर खेळाडूंनाही लागण होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारत सरकारने करोनाच्याच भीतीने चीनच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला होता.