मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागताच शिवसेनेच्या भाषेत बदल होऊ लागला आहे. लोक माजायला लागतात तेंच्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम जनता करते, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सत्तेन समान वाट्याची मागणी पुन्हा एकदा ताणून धरली आहे. लोकसभेच्यावेळी समान जागा वाटपाचा निर्णय झाला होता. विधान सभेलाही 144-144 जागांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यावेळी भाजपाच्या अडचणी मी समजावून घेतल्या. मला माझा पक्षही वाढवायचा आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी माझ्यासोबत बसून फॉर्म्युला ठरवावा. गरज भासली तर आम्ही अमित शहा यांची भेट घेऊ,अशी सडेतोड भूमिका ठाकरे यांनी घेतली
दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका राजकीय निरीक्षकांना कोड्यात टाकणारी आहे. भाजपाने त्यांच्या या मागणीला किंमत न दिल्यास शिवसेना कोणती पावले उचलणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेने सरकार स्थापन केल्यास त्यास कॉंग्रेस पाठींबा देण्यास तयार आहे, असे विधान कॉंग्रेसच्या एका नेत्याने केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या घोषणा शिवसेनेने केल्या होत्या. त्यामुळे शिवसेना भाजपाशी युती कायम ठेवणार की नवी समीकरणे जुळवत राष्ट्रवादी, कॉंग्रेसशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.