कोल्हापूर – यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना केले आहे.
दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक 5 व 6 जूनला थाटामाटात साजरा होत असतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही करोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकारने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल, असे त्यांनी सांगितले.
मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज हे वातावरण अनुभवायला आपण उत्सुक आहोत. पण, करोना संकटामुळे मर्यादा येत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींनी दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत.
सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी…! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.