Sambhaji Raje । Emotional । Kolhapur : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान आता दोघांकडून देखील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून, राजकीय दौरे देखील सुरु झाले आहेत. आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजे मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, अनेकदा आक्रमक दिसलेले संभाजीराजे आता मात्र भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, सहा वर्षांचा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आता त्यांच्यासमवेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना निरोप देताना राजेंना गहिरवरुन आले, तर सुरक्षा रक्षकांचेही डोळे पाणावले होते.
संभाजीराजेंसोबत एस.पी.यु म्हणून दोघांनी तब्बल 7 वर्षांपेक्षा अधिकचा कार्यकाळ व्यतीत केला. त्यामुळे, साहजिकच राजेंचं त्यांच्यासमवेत कौटुबिक नातं आणि जिव्हाळा निर्माण झाला होता. आता मात्र त्यांना निरोप देताना संभाजीराजे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
संभाजीराजे म्हणतात की, “यश लोणकर व राजेश गर्जे दोघे गेल्या 7 वर्षांपासून माझ्याकडे एस.पी.यु (स्पेशल प्रोटेक्शन युनिट) म्हणून कार्यरत होते. अविरतपणे आणि अखंड कर्तव्य त्यांनी या काळात बजावले. शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त आजरा तालुक्यात दौरा सुरू असताना त्यांच्या बदलीचा आदेश काल आला.
मला याची काहीच कल्पना नव्हती, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी हे दोघे आले आणि आमची बदली झाली असल्याचा आदेश मुख्यालयातून आल्याचे सांगितले… मला थोडावेळ काय बोलावे कळेना.
गेली सात वर्षे सातत्याने सोबत राहणारे माझी काळजी घेणारे उद्या जाणार या भावनेनेच माझे मन भरून आले. त्यांची स्थिती माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. पण सरकारी कर्मचारी असल्याने बदली तर होणार हे स्वाभाविक आहे.
आज सकाळी दोघे निरोप घेण्याकरिता आले असता, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत निरोप दिला. त्या वेळी दोघांचे पापणी आड दडलेलं अश्रु गालावर आले… त्यांनी दिलेली साथ सदैव आठवणीत राहील, पण यापुढेही त्यांच्या सोबत मी कायम असेन! असं ते म्हणाले.