औरंगाबाद – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमधील कार्यक्रम आटोपता घेतल्याने शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजावंदन पार पडले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री हैद्राबादच्या दौऱ्यावर रवाना झाल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला अंबादास दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. दरवर्षी सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम घेतला जातो. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी नऊ वाजण्याऐवजी सकाळी सात वाजताच कार्यक्रम घेतला असे स्पष्ट मत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला मुख्ममंत्र्यांनी कमी वेळ दिला, त्यांना हैद्राबादला जाण्याची घाई होती. ते दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून हैद्राबादला जात आहेत. राज्यातील एमआयडीसीतील भुखंडासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घ्यावी अशी मागणीही दानवेंनी यावेळी केली. मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अमित शहा देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैद्राबादला गेले.