मुंबई – दुस-या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती. आरएसएस स्वातंत्र्य संग्रामात कुठेही नव्हती. पण भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्व करेल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना शिवसेनेची पुढील ध्येय धोरणे सांगितली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात भाजपवर टीकास्त्र सोडले. रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण ते पैसे मागण्यासाठी पोहोचत आहेत, आपल्याला तसं करायचं नाही, असेही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले.
“देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’. माझ्यापर्यंत तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती, आता भाजप पैसे गोळ्या करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
तसेच नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार, असे म्हणतात. हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा, मग आम्ही तुमचं स्वागत करू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पाकिस्तानमध्ये भगवा फडकावा, आम्हाला आनंद होईल, असेही उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले.