बुलढाणा – बुलढाण्यात शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी अंधेरी निवडणुकीवरून भाजपावर टीका केली आहे. तसेच, पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्याला परत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
धनुष्यबाण गोठवले तरी हातातली मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचे एक महत्त्व असते. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारले होते. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल असते. निवडणूक आयोगाने काही काळापुरता हा आदेश दिला आहे. नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि इतरांना विनंती करावी, असे मत व्यक्त केले जात होते. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. त्याबद्दलही काही जणांना वाटतं की मी विनंती केली नाही. पण मी का विनंती करू?, असा सवाल त्यांनी केला. माझ्या पक्षाचं नाव गोठवलंत, माझं चिन्ह गोठवलंत. एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढलात. मग एवढं सगळं कशाला केलं? फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं गेलं, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला