कर्जत – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम शिवसेना संपविण्याचेच होते, हे मी मागील दोन वर्षांपासून सांगत होतो. सामान्य शिवसैनिकांना आजही वाटते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महाविकास आघाडी सरकारातून बाहेर पडून हिंदुत्त्ववादी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षाचे 39 आमदार सोडले, मात्र ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. शिवसेनेच्या चुकीमुळेच शिवसेना संकटात असल्याचा टोला खासदार सुजय विखे यांनी लगावला.
कर्जत तालुक्यात आले असता एका कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. पंढरपूरला पांडुरंगाची पूजा कोण करणार, कोणता मुख्यमंत्री येतोय हे तुमच्या मनात, माझ्या मनात असून उपयोग नाही. पांडुरंगाच्या मनात काय आहे, पूजा कोणी करावी, हे पांडुरंगाने ठरविले आहे, असे म्हणत खासदार सुजय विखे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर स्पष्ट न बोलता भाष्य केले.
भाजप जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने सामान्य नागरिकांवरील संकटे वाढत असताना राज्यात स्थिर सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी, गोरगरिबांचे व हिंदुत्त्ववादी सरकार येईल. मी तुम्हाला शब्द देतो की यापुढे एकाही शेतकऱ्याला पाण्यासाठी भांडावे लागणार नाही. आमदार रोहित पवार त्यांच्यावर टीका केली.