मुंबई: महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तास्थापनेचा गोंधळ अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तसे पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून चांगलाच गोंधळ सुरु होता. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला होता पण मंत्रिपदाच्या वाटपावरून या दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून राज्यात पर्यायी सरकार दिले आहे. उद्या मंगळवारी शपथविधी सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. लवकरच अधिकृत माहिती मिळणार आहे.