पिंपरी -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात शिवसैनिक त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा दावा शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी केला आहे. तर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना परत या म्हणून भावनिक आवाहन देखील त्यांनी केले आहे.
पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुमच्या पदरात घालतोय, त्यांना सांभाळा, असे भावनिक आवाहन केले होते. ज्या बाळासाहेबांनी रिक्षावाला, टपरीवाला, पेपरवाला, ड्रायव्हर असणाऱ्यांना आमदार, खासदार ते थेट मंत्री केले.
शिवसेनेच्या जिवावर ज्यांनी आमदारक्या मिरवल्या, करोडो रुपयांची माया जमवली त्यांनी शिवसेनाच स्वतःच्या नावावर करण्याचा आणि मालक होण्याचा डाव आखला ही तळपायाची आग मस्तकात जाणारी बाब आहे. निष्ठावंतपणाचे ढोंग करणारी ही मंडळी आता बाळासाहेब ठाकरेंच्या नावानेच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करण्याचे पाप करीत आहेत. पक्षात अनेक लोक येतात-जातात प्रत्येकाने विचार करूनच पुढचे पाऊल टाकावे. उद्या राजकारणात काहीही होवो पण या एका गोष्टीसाठी शिवसैनिक तुम्हाला कधीही माफ करणार नाही एवढे नक्की लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.