मुंबई – महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. आता राज्यात सरपंचाची निवड ही जनतेतूनच होणार आहे, यावर विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने आधीच्या सरकारने घेतला निर्णय आता मोडीत काढला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीष महाजन यांनी मांडले आणि विधेयक बहुमताने पारीत करण्यात आले. या विधेयकामुळे थेट सरपंच निवड जनतेतून होताना पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतिपदी आणि माननीय जगदीप धनखड यांची भारताच्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करीत आहे. अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आमच्या सगळ्यांसमोर एक आदर्श आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष आणि संकटांवर मात करण्याची त्यांची इच्छाशक्ती ही आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी अभिनंदन केले.