मुंबई – राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून जोरदार खडाजंगीने सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मात्र, अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्न करण्यात आले. महागाई, पूरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाईविरोधात विरोधकांनी आज अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारविरोधात आंदोलन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून “50 खोके, एकदम ओके’, “आले रे आले गद्दार आले’ अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईडीच्या कारवाईविरोधातही विरोधकांनी “ईडी सरकार हाय हाय’, “शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो’ अशी घोषणाबाजी करत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्या वतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, एकनाथ खडसे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, अंबादास दानवे सहभागी झाले आहेत.
यावेळी विरोधकांनी राज्यांत लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली. विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकजूट दाखवली आहे.
दरम्यान, शिंदे सरकारमधील खातेवाटपाच्या धुसफुसीवरूनही विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. तसेच वंदे मातरम्ची सक्ती म्हणजे विकासावरून मुद्दा हिंदुत्वाकडे भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.