इंद्रायणीनगर – भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, धावडे वस्ती, इंद्रायणी कॉर्नर, रोशन गार्डन येथील अनधिकृतपणे थाटलेल्या टपऱ्यांवर “ई’ क्षेत्रीय कार्यालयाने आठवड्यापूर्वी धडक कारवाई केली होती. परंतु जे टपरीधारकांवर कारवाईत झाली नाही त्यांनी स्व खर्चाने क्रेन लावून आपल्या टपऱ्या जवळच्या गल्लीबोळांमध्ये स्थलांतरीत केल्या आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या कारवाईत अनेकांच्या दुकानांची तोडफोड होऊन अनेक किमती सामान जप्त करण्यात आले होते. यामुळे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे कारवाईत अनावधानाने सुटलेल्या व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार होती. या भीतीपोटी अनधिकृत टपरीधारक मालकांनी स्वतः आपले बस्तान गुंडाळण्यात धन्यता मानली असून, गल्लीबोळाचा आश्रय घेतला असल्याचे चित्र सध्या भोसरी परिसरात पहावयास मिळत आहे.
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळील टपरीमालकांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने अनधिकृत टपरी उचलून स्थलांतर केले आहे. तर सततच्या कारवाईमुळे दुकानच चारचाकी टेम्पोमध्ये किंवा दुकानाला चाके लावलेली दुकाने रस्त्यावरून ढकलताना सर्रास दिसत आहेत. स्थलांतर करून परिसर मोकळा केला असला तरी महामार्गापासून जवळील गल्लीबोळात या अनधिकृत टपऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. यामध्ये कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील सहल केंद्राकडे जाणारा रस्ता, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणी कॉर्नर, सद्गुुरुनगरच्या गल्लीबोळात आपली दुकाने थाटली आहेत. एका रात्रीत अचानक गल्लीबोळात दुकाने थाटल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांची वाढली डोकेदुखी
चहाची टपरी, पान टपरी, फळ व्यावसायिक अशा अनेक किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांनी अनोखी शक्कल शोधून काढली आहे. स्थलांतर झालेल्या ठिकाणी बहुतेक रहिवासी सोसायट्या असल्यामुळे आता गल्लीबोळात बिनधास्त सिगारेटचे धूर व गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून रस्ते रंगविले जातील. याचा परिणाम लहान मुलांच्या समाजमनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या टपरिधारकांवर संबंधित विभाग कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार
भोसरी परिसरात मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. त्यामुळे रस्त्यांवर अनधिकृतपणे टपऱ्या टाकून व्यवसाय करणाऱ्यांचे चांगेलच धाबे दणाणले आहेत. परंतु त्यांनी मुख्य मार्गावरून जवळच असलेल्या गल्लीबोळात आपल्या टपऱ्यांचे स्थलांतर केल्याने येथील वाहतूक व्यवस्था देखील कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने गल्लीबोळात स्थलांतरीत झालेल्या टपरीचालकांची सोय करणे गरजेचे आहे.