मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. राणे यांना काल अटक व जामिनही देण्यात आला आहे. मात्र हा वाद आणखी सुद्धा निवळलेला दिसून येत आहे. मात्र आता या वादात भाजपनेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
शेलार म्हणाले की, एका व्यक्तीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती. पण, तेव्हा पवारांनी संयम पाळत त्या व्यक्तिला माफ केलं होतं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही’, असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला धरून शिवसेनेला लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काही वर्षांपूर्वी शरद पवारांना कानशिलात लावलेली देशानं पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही’, असं शेलार म्हणाले. शेलारांनी पवारांसोबत घडलेल्या घटनेची आठवण करून देत एकप्रकारे नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी मंगळवारी गृहखात्याच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित असून याची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही शेलार यांनी केली आहे.