इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी सरकार स्थापनेचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. अनेक दिवसांच्या वाटाघाटींनंतर या दोन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेच्या फॉर्म्युलाबाबत सहमती झाली आहे. काल रात्री झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी या बाबतची माहिती माध्यमांना दिली.
पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख शेहबाझ शरीफ हे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील, तर पीपीपी पक्षाचे सह अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे देशाचे अध्यक्ष होतील, असे त्यांनी सांगितले. पीपीपी आणि पीएमएल-एन दोन्ही पक्षांकडे मिळून आवश्यक तेवढे संख्याबळ आहे. आता आम्ही मिळून सरकार स्थापन करू शकतो, असे बिलावल भुट्टो झरदारी यांनी सांगितले.
पीपीपीएल आणि पीएमएल-एन पक्षामध्ये चर्चेच्या पाच फेऱ्या होऊन गेल्या होत्या. सोमवारी देखील दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकला नव्हता. दिनांक ८ फेब्रुवारीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे.
तसेच सर्वाधिक जागा इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या पाठिंब्यावरील अपक्षांना मिळाल्या होत्या. पीटीआय पक्षाच्या ९३ अपक्षांचा विजय झाला. तर पीएमएल-एन आणि पीपीपीचे अनुक्रमे ७५ आणि ५४ उमेदवार निवडून आले. याशिवाय पीपीपी आणि पीएमएल-एन ला पाठिंबा देणाऱ्या एमक्यूएम-पी चे १७ उमेदवार निवडून आल्यामुळे आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी या तिन्ही पक्षांचे संख्याबळ पुरेसे आहे. पाकिस्तानच्या संसदेत एकूण सदस्य संख्या १६६ असून सरकार स्थापन करण्यासाठी १३३ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
पीटीआयचा पाठिंबा असलेले अपक्ष आणि सुन्नी इत्तेहाद कौन्सिलला मिळून हा साध्या बहुमताचा आकडा गाठणे शक्य झाले नाही, असेही बिलावल भुट्टो झरदारी यांनी सांगितले. आर्थिक अडचणीत आलेल्या पाकिस्तानला पीएमएल-एन आणि पीपीपीच्या आघाडीमुळे आर्थिक स्थिरता मिळू शकेल, असेही बिलावल भुट्टो म्हणाले.
आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवल्याबद्दल पीएमएल-एनचे अध्यक्ष शेहबाझ शरीफ यांनी पीपीपी पक्षाला धन्यवाद दिले आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांच्या ऐक्यावर विशेष भर दिला आहे. झरदारी यांना देशाचे अध्यक्ष करण्यात यावे ही पाकिस्तान पीपल्स पार्टीची मुख्य अट मान्य करण्यात आली आहे. त्याशिवाय पीपीपीने अन्य कोणत्याही मंत्रिपदाची मागणी पीएनएल-एनकडे केलेली नाही.
मात्र याच मुद्यावर दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकमत होत नव्हते. आघाडीला सहमती झाली, म्हणजे दोन्ही पक्षांनी दुसऱ्या पक्षाचे म्हणणे मान्य केले असे नाही. तर दोन्ही पक्षांमध्ये एका मध्यवर्ती मुद्यावर एकमत घडवून आणले गेले आहे, असे देखील शेहबाझ शरीफ म्हणाले.
आघाडी सरकारच्या रचनेबाबतचा तपशील नवाझ शरीफ आणि पीपीपीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नंतर जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तडजोडीचे मुद्दे –
देशाचे अध्यक्षपद, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांचे राज्यपाल पीपीपीला देण्यात आले आहे. याशिवाय बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्रीपद देखील पीपीपीला देण्यात आले आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीपद पीएमएल-एन पक्षाला मिळाले आहे. पीएमएल-एनकडे पंतप्रधानपद, संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांचे राज्यपालपद देण्यात आले आहे. बलुचिस्तानमध्ये दोन्ही पक्षांचे समान सदस्य असलेले आघाडी सरकार स्थापन केले जाणार आहे.