लंडन – युएई आणि ओमानमध्ये येत्या 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने टी-20 विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार करण्याचा निर्णय घेतला. तसेच या स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ देखील संपणार आहे. तत्पूर्वी रवी शास्त्री यांनीही प्रशिक्षकपद सोडण्याचे संकेत दिले आहे.
रवी शास्त्री यांना एका मुलाखतीत विचारले गेले की, आगामी टी -20 विश्वचषक स्पर्धा ही मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची शेवटची स्पर्धा असेल का? या प्रश्नाचे उत्तर देत रवी शास्त्री यांनी म्हटले होते की, मला असा आत्मविश्वास आहे की, मला जे काही हवं होतं, ते मी सध्या केलं आहे. माझ्या कारकिर्दीतील 5 वर्षात भारतीय संघाने जे काही केलं आहे, त्यावरून मी संतुष्ट आहे.
आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये पाच वर्ष अव्वलस्थानी होतो, ऑस्ट्रेलियामध्ये 2 वेळेस विजय मिळवला. तसेच इंग्लंडमध्येही आम्ही विजय मिळवला. मी मायकल एथरटनसोबत चर्चा केली होती. त्यांना मी म्हटले की, हे माझ्यासाठी शेवटचे आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत करणे आणि कोव्हिडच्या काळात इंग्लंडमध्ये विजय मिळवणे. आम्ही मालिकेत 2-1 ने आघाडीवर होतो, ज्याप्रक्रारे आम्ही इंग्लंड आणि लॉर्डसमध्ये विजय मिळवला ते खास होते.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्ही सर्व संघांना पराभूत केले आहे. जर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात आम्हाला यश आले तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील गेल्या 4 दशकातील सर्वात समाधानकारक क्षण आहे. भारतीय क्रिकेटला प्रशिक्षण देणे म्हणजे ब्राझील आणि इंग्लंड फुटबॉल संघाला प्रशिक्षण देण्यासारखेच आहे. नेहमीच जिंकण्यासाठी संघावर दबाव असतो, असे रवी शास्त्री म्हणाले.