दुबई – बहुप्रतिक्षित आयपीएलच्या उर्वरित पर्वाला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. सर्व संघ विलगीकरणाचा कालावधी संपवून मैदानात सरावासाठी सज्ज झाले आहेत. सध्या प्रत्येक संघ उर्वरीत सामन्यांत यश मिळवून बाद फेरीत पोहचण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच अनेकांनी काही नव्या खेळाडूंना संघात स्थान देत आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या कट्टर प्रतिस्पर्ध्यातील लढतीने दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ होणार आहे.
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेअगोदर यूएईत खेळण्यात येणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील अनुभवही खेळाडूंसाठी मौलाचा ठरणार आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला होता. तसेच आयपीएल स्पर्धेवेळी बायो-बबलचाही भंग झाल्याने ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने गेल्या हंगामाचे अपयश मागे सारून यंदा विजयी पंचकासह दुसरे स्थान कमावले आहे. त्यामुळे आता उर्वरित सातपैकी किमान तीन लढती जिंकल्यास चेन्नईचे बाद फेरीतील स्थान सुनिश्चित होईल. शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा व इंग्लंडचे मोईन अली, सॅम करन या अष्टपैलू चौकडीवर चेन्नईची भिस्त असणार आहे.
महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाडही कामगिरीत सातत्य राखण्यासाठी उत्सुक आहे.
दुसरीकडे गतविजेता मुंबईचा संघ स्पर्धेला संथ गतीने सुरुवात करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे आता उर्वरित सात लढतींमध्ये ते किती लवकर लय मिळवतात, यावर मुंबईचे यश अवलंबून असणार आहे.
ट्विटी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मुंबईच्या सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, राहुल चहर आणि इशान किशन यांच्यावर आपसूकच सर्वाच्या नजरा असणार आहे.
2020मध्ये उपविजेतेपद मिळवलेल्या दिल्ली कॅपिटल्सने यंदाही दमदार खेळी करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवित पहिले विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे.
उर्वरित सात सामन्यांतून किमान दोन लढतींमध्ये दिल्लीने वर्चस्व गाजवल्यास ते नक्कीच बाद फेरी गाठतील. तसेच ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणारा विराट कोहली बंगळुरूला “आयपीएल’चे पहिले-वहिले जेतेपद मिळवून देणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. बंगळुरुच्या संघातील अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतल्याने त्यांना नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे. पाच विजय नावावर असलेला बंगळुरु कोलकाताविरुद्धच्या सामन्याने अभियानाला पुन्हा आरंभ करणार आहे.