नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पक्षाने कार्यकारिणीची निवडणूक घेतल्यास आपण रिंगणात उतरणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविल्यानंतर ते इतर कोणत्याही निवडणुकीचा विचार करत नसल्याचे समोर आले आहे.
थरूर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, रायपूर अधिवेशन काँग्रेसच्या इतिहासातील संक्रमण काळात होणार आहे. पक्षाध्यक्ष आणि भारत जोडो यात्रेच्या निवडीनंतर आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे अधिवेशन होणार आहे. तिरुअनंतपुरममधील लोकसभा सदस्य म्हणाले की अधिवेशन यापेक्षा चांगल्या वेळी होऊ शकले नसते. यादरम्यान, पक्षाच्या सदस्यांना आपण काय साध्य केले आणि भविष्यातील आव्हानांसाठी पक्षाला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल.
काँग्रेसच्या अधिवेशनात कार्यकारिणीची निवडणूक होणे आवश्यक आहे का तसेच हा मुद्दा त्यांनी पक्षनेतृत्वाकडे मांडला आहे का? असा प्रश्न थरूर यांना विचारण्यात आला. त्यावर थरूर म्हणाले, “निवडणूक ही पक्षाच्या हिताची आहे, असा मुद्दा मी यापूर्वी उपस्थित केला होता. मी एक निवडणूक लढवली आहे. ती निवडणूक मी हरलो असल्याने पक्ष नेतृत्वाने काय करावे हे सांगणे माझे काम नाही असे मला वाटते” असा स्पष्ट मत थरूर यांनी व्यक्त केले.