मुंबई – जागतिक आर्थिक परिस्थिती संदीप असतानाच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्राचा हल्ला केला. यामुळे जागतिक बाजारात सोमवारी विक्रीचे वारे होते. त्याचा परिणाम भारतातही होऊन भारतामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक पुन्हा एक टक्क्याने कमी झाले.
शुक्रवारीही शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले होते. त्यामुळे या दोनच दिवसात शेअर बाजाराची बरीच मोठे हानी झाली.
आज निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसांमध्ये 5.18 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 845 अंकांनी म्हणजे 1.14 टक्क्यांनी कोसळून 73,399 या दोन आठवड्याच्या निचांंकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 246 अंकांनी म्हणजे 1.10 टक्क्यांनी कमी होऊन 22,272 अंकावर बंद झाला.
गेल्या दोन कामकाजाच्या दिवसांमध्ये सेन्सेक्स 1,638 अंकांनी म्हणजे 2.19 टक्क्यांनी कोसळला आहे. आज झालेल्या विक्रीमुळे विप्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, लार्सन अँड ट्यूब्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँकेला फटका बसला. नेस्ले, मारुती, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
स्मॉल कॅप 1.54 टक्क्यांनी तर मिड कॅप 1.50 टक्क्यांनी कोसळला. सेवा क्षेत्र, आयटी, बँकिंग या क्षेत्राचे निर्देशांक आज पिछाडीवर होते. तर तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचे निर्देशांक वाढले. आखातातील पेचामुळे खनिज तेल महाग होईल आणि त्यामुळे तेल कंपन्यांचा नफा वाढेल असे काही गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे दिसून येते. लवकरच भारतातील विविध कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
परदेशी गुंतवणूकदाराकडून जास्त विक्री
अमेरिकेत व्याजदर कपात लांबणीवर पडणार असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार गेल्या पंधरा दिवसापासून भारतीय शेअर बाजारात विक्री करीत होते. त्यातच आता मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील विक्री वाढली आहे. या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 8027 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आजही या गुंतवणूकदारांनी विक्री केली असल्याचे ब्रोकर्सनी नमूद केले.