मुंबई – कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संबंधित खात्याचे केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.
The second wave of #COVID19 Pandemic has impacted heavily on our people, devastating their every means of livelihood. The farming community is reeling under one of the worst ever crisis and their issues need to be addressed immediately.@DVSadanandGowda @PMOIndia pic.twitter.com/IHw0pBhpIJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
कोरोना महामारीमुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरीही अडचणीत आहे. अशाच परिस्थितीत केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.
इंधनाच्या वाढीव दरासोबत आता नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. हा निर्णय अत्यंत धक्कादायक असून याचे त्वरित पुनरावलोकन करणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
खतांचे वाढलेले नवीन दर –
इफको 10:26:26 चा जुना दर हा 1175 रुपये इतका होता, तो आता 1775 रुपये इतका झाला आहे.
इफको 10:32:16 चा जुना दर हा 1190 इतका होता आता तो 1800 रुपये इतका झाला आहे.
इफको 20:20:00 चा जुना दर हा 975 रुपये इतका होता तो आता वाढून 1350 रुपये इतका झाला आहे.
डीएपी खताचा जुना दर हा 1875 रुपये इतका होता, तो आता 1900 रुपये इतका झाला आहे.
आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत 1200 रुपये होती ती आता 1900 रुपये इतकी झाली आहे.
आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही 975 रुपये इतकी होती, ती आता 1400 रुपये इतकी झाली आहे.
पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी 850 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान, खताला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम भारतातील खताच्या किंमतीवर झाला, त्यामुळे खतांच्या किंमती वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.