नवी दिल्ली ( corona vaccination for covid recovered ) – सरकारने करोनावर मात केलेल्या व्यक्तींना नऊ महिन्यांनंतर लस देण्यात यावी असा सल्ला एनटीएजीआय ( NTAGI ) पॅनलतर्फे देण्यात आलाय. अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन ( NTAGI ) अर्थात एनटीएजीआय लसीकरण मोहिमेसंदर्भात सरकारतर्फे नेमण्यात आलेला तज्ज्ञ गट आहे.
यापूर्वी, सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या तज्ज्ञ गटातर्फे देण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने दोन कोविशिल्डच्या डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता करोनातून बरे झालेल्या रुग्णांना लस देण्यासंदर्भात एनटीएजीआय पॅनलने सल्ला दिलाय.
एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना करोनामुक्तीनंतर किती महिन्यांनी लस देण्यात यावी याचा कालावधी वाढवण्याचा सल्ला देण्यात आल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने ( NTAGI ) यापूर्वी करोनामुक्त झालेल्या व्यक्तीने करोनाप्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यासाठी सहा महिन्यांचं अंतर सुरक्षित आहे असं म्हंटलं होत. मात्र आता हे अंतर ९ महिने असावे असा सुधारित सल्ला त्यांनी दिला आहे.
गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांचे लसीकरण
एनटीएजीआय पॅनलतर्फे गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यात यावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
दुसरा डोस घेण्याआधीच करोना बाधा झाली तर?
करोनाप्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा घेण्यापूर्वीच एखाद्या व्यक्तीला विषाणूची बाधा झाल्यास त्या व्यक्तीने करोनामुक्त झाल्याचा चार ते आठ आठवड्यांनंतर लसीचा पुढचा डोस घेतला पाहिजे असंही एनटीएजीआय पॅनलतर्फे सुचवण्यात आलं आहे.
मोनोक्लोनल अॅण्टीबॉडीजच्या किंवा कानव्हलेसंट प्लाझ्मा उपचार पद्धतीने बरे झालेल्या रुग्णांचे लसीकरण
ज्या रुग्णांनी मोनोक्लोनल अॅण्टीबॉडीजच्या मदतीने किंवा कानव्हलेसंट प्लाझ्मा उपचारांच्या मदतीने करोनावर मात केलीय त्यांनी लसीचा डोस तीन महिन्यानंतर घेतला पाहिजे असं तज्ज्ञ समिती सांगते.