नवी दिल्ली : सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आमच्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतली. यावर अजून चर्चा झाली नाही, चर्चा करू. तसंच या प्रकरणी मी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही, असंही पवारांनी स्पष्ट केले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. परमबीर सिंह यांचे हे पत्र दोन भागात आहे. एका भागात अनिल देशमुख आणि दुसऱ्या भागात डेलकर प्रकरणाचा उल्लेख आहे. परमबीर सिंह यांनी लिहिलेले हे पत्र धक्कादायक असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच बदली झाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रावर परमबीर सिंह यांची सही नाही. तसेच पैसे कसे दिले घेतले गेले याचा उल्लेख नाही. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता, असा दावाही शरद पवार यांनी केला.