अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवला बाद देण्यावरुन आता पंचांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पंचांनी हा झेल वैध होता का ते पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली मात्र, अनेकदा रिप्ले पाहूनही त्यांनी सूर्यकुमारला बादच ठरवले. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाकडे मदत मागताना सॉफ्ट सिग्नल या नियमाचा वापर का केला, असे अनाकलनीय नियम हद्दपार केले पाहिजेत, असे परखड मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
सूर्यकुमारचा झेल डेव्हिड मलानने घेतला. त्यानंतर हा झेल योग्यपणे घेतला आहे की नाही याबाबत शंका असल्याने मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला.तिसऱ्या पंचाने अनेकदा रिप्ले पाहूनही सूर्यकुमारला बाद ठरवले. चेंडू जमिनीला लागला असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत असतानाही सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे तिसऱ्या पंचानेही त्याला बाद ठरवले.
जेव्हा मैदानावरील पंच एखाद्या निर्णयासाठी तिसऱ्या पंचाकडे मदत मागतात तेव्हा त्यांना स्वत:चा निर्णय सॉफ्ट सिग्नलच्या माध्यमातून सांगावा लागतो. सूर्यकुमारच्या बाबत देखील असेच झाले. मैदानावरील पंचाचा निर्णय योग्य आहे का हे ठरवण्याचे काम तिसरा पंच करतो. आयसीसीच्या नियमानुसार सॉफ्ट सिग्नलचा निर्णय बदलता येत नाही. जर बदलायचा असेल तर त्यासाठी पुरेसे पुरावे आवश्यक असतात. सूर्यकुमारला मैदानावरील पंचाने सॉफ्ट सिग्नल बाद दिले होते. त्यामुळे त्याला बेनिफिट ऑफ डाऊटचा फायदा मिळाला नाही.
आयसीसीने जेव्हा ही नवी नियमावली तयार केली तेव्हापासूनच त्यावर टीका सुरु झाली होती. मैदानावरील पंचांना जर एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम असेल तर हा निर्णय रिप्ले पाहुन तिसरा पंच देतो. पण जर तिसऱ्या पंचालाही खात्री नसेल तर संशयाचा फायदा फलंदाजालाच दिला जातो. या सामन्यात मात्र, हा संकेत पाळला गेला नाही.
सुंदरबाबतही गोंधळ..
सूर्यकुमार यादव प्रमाणे वॉशिंग्टन सुंदर बाबतही तेच घडले. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर आदिल रशिदने सीमारेषेवर झेल घेतला. तेव्हा त्याच्या डावा पाय सीमारेषेवर लागला होता. मैदानावरील पंचाने सुंदरलाही सॉफ्ट सिग्नलद्वारेच बाद ठरवले.