नवी दिल्ली – अचंथा शरथ कमाल, मनिका बात्रा, सुतिर्थ मुखर्जी व जी. साथियन हे भारताचे चार टेबल टेनिसपटू टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत. दोहा येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत सरस कामगिरी केल्यामुळे त्यांना पात्रता मिळवता आली. आशियाई गटाच्या अंतिम फेरीनंतर साथियन अव्वल स्थानी आल्यामुळे त्याला टोकियोचे तिकीट मिळाले.
सुतिर्थाने मनिकाचा पराभव केल्याने तर मनिकाने जागतिक मानांकनात आघाडी घेतल्याने या दोघींनाही पात्रता मिळाली. शरथ कमालने पाकिस्तानच्या रमीज महंमदचा पराभव केला व टोकियोत स्थान निश्चित केले. अर्थात साथियनविरुद्धच्या लढतीत शरथला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे साथियनचे मानंकनही सुधारले व तो देखील ऑलिम्पिकला पात्र ठरला.
शरथ 2004 सालच्या ऍथेन्स, 2008 सालच्या बीजिंग व 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता त्याचे हे चौथे ऑलिम्पिक ठरणार असून यंदा तरी तो पदक मिळवण्यात यशस्वी ठरणार का हीच उत्सूकता आहे.