नवी दिल्ली – शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज हे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिले. पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.
दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादीचे हे आठवे अधिवेशन असून, शरद पवारांच्या उपस्थिती हे अधिवेशन पार पडत आहे. यासाठी देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे. शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात देशात मोठे बदलाव आले आहेत. शेतकरी देशाच्या अन्नाची गरज पूर्ण करते. देशाला शेतकऱ्यावर गौरव आहे. पण शेतकऱ्यांच्या दुखत आत्महत्या होत आहे. आपल्या देशात 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांवर गर्व आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्रितपणे लढण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
तसेच देशात अल्पसंख्यक समाजाबद्दल विरोधाचे वातावरण तयार केले जात आहे. संसदेत तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा करण्यात आली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकऱ्यांचा पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी येतील, त्या त्यावेळी राष्ट्रवादी लढण्यासाठी मैदानात उतरेल, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस कर्नाटक आणि हरियाणात ताकदीने पक्षविस्तार करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला यापूर्वी महाराष्ट्राबाहेर केरळ, लक्षद्वीप, गुजरात आणि झारखंडमधील निवडणुकांमध्ये काही जागांवर विजय मिळालेला आहे.