मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत.
लोकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी या दृष्टीने हा संवाद असणार आहे. राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा आणि सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर शरद पवार हे जनतेशी संवाद साधतील.
महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १३० च्या वर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भीतीचे वातावरण आहे. काळजी घेण्याचे, घराबाहेर न पडण्याचे आवाहन दररोज केले जात आहे. महाराष्ट्रातील जनता त्याचे पालनही करते आहे. अशात त्यांच्या मनातली भीती मात्र कायम आहे. ही भीती घालवण्यासाठीच शरद पवार हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.