रायगड: “निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे झालेले नुकसान खूप जास्त आहे. सरकारने आता केलेली मदत अंतिम नाही. पंचनामे झाल्यावर काय मदत द्यायची हे ठरेल.
आवश्यकता लागली तर मदतीसाठी दिल्लीत पाठपुरवठा करू, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.
नुकसानीचे पंचनामे लवकर झाले पाहिजेत. केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. महाराष्ट्रावरचे हे संकट मोठे आहे, त्यामुळे यात पक्ष, राजकारण बघू नये. सगळ्यांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत केली पाहिजे, असे आवाहनही शरद पवारांनी केले.
कोकणातील फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नारळ, काजू , आंबा, सुपारी या फळबागा येथे आहेत. नारळ, सुपारीची पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. उद्ध्वस्त झालेल्या नारळ बागा पुन्हा उभ्या राहायला पुढची 10 वर्षे जातील. शेती पूर्ववत करायला मोठा खर्च करावा लागेल. राज्य सरकार आणि केंद्राने मदत करण्यासाठी आवश्यक धोरण ठरवणे गरजेचे आहे. मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. आधीच करोना आणि वादळामुळे दुहेरी फटका बसल्याने त्यासाठी वेगळे पॅकेज देणे आवश्यक आहे, असे शरद पवारांनी सांगितले.
टाटा, रिलायन्स आणि अदानींची मदत शक्य…
केंद्र सरकार आणि राज्याला सांगून मदत घ्यावी लागेल. छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. पाच ते सहा दिवसाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे. टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची टीम याठिकाणी आली तर मदत होईल. अदानीमधून काहीजण मदतीला आले, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पाणीपुरवठा लवकर सुरू केला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले.