नवी दिल्ली – केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे अनेक जण समर्थन तसेच टीकाही करत आहे. अशातच जेएनयू विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाची माजी प्रमुख नेता शेहला रशिदने काश्मीरवर काही वादग्रस्त ट्विट केले आहेत. यामुळे शेहला चांगलीच अडचणीत सापडली असून सर्वोच्च न्यायायलायचे वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी शेहलावर गुन्हा नोंदविण्यात येऊन तिला अटक व्हावी, अशी मागणी केली आहे.
शेहला रशिद मूळ काश्मिरी असून ३७० कलम रद्द झाल्यावर तिने सातत्याने ट्विट करत सरकार आणि भारतीय सैन्यावर टीका केली. तिने म्हंटले कि, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक आहे. सैन्याचे जवान आणि पोलीस सामान्य नागरिकांच्या घरात घुसून त्यांना त्रास देत आहेत. शोपियामध्ये सुरक्षादलाच्या आधारे काही लोकांना जबरदस्तीने अटक केली जात असून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोपही शेहलाने ट्विटरद्वारे केला. यानंतर वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत काश्मीरसंबंधित शेहला अफवा पसरवत असून तिला अटक करण्याची मागणी केली आहे.
भारतीय सैन्यानीही शेहला रशिदचे सर्व आरोप फेटाळले आहेत. सैन्याने म्हंटले कि, शेहला रशिदचे सर्व आरोप तथ्यहीन असून त्याला सत्याचा कोणताही आधार नाही. ते पुढे म्हणले, काश्मीरमधील परिस्थिती शांततापूर्ण असून नियंत्रणात आली आहे. श्रीनगरमध्ये शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. तर अनेक सरकारी कार्यालयातही कामे सुरु झाली आहेत.