इंदापूर, (प्रतिनिधी) – मागील तीन-चार वर्षांपासून कोणतेही राजकीय पक्षात सक्रिय नसलेला व सामाजिक उपक्रमातून तालुक्यात नावलौकिक कमावलेला इंदापूरच्या शहा परिवाराची विशेष भेट रविवारी (दि. 25) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. काही मिनिटाच्या भेटीतच इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा यांनी मागणी केलेल्या कालठण – चिकलठाण या भीमा नदीवरील पुलाला मार्गी लावण्याचे काम अवघ्या तीन-चार महिन्यांत केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
इंदापूर शहरातील शहा परिवाराच्या निवासस्थानी इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंद शहा तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, युवा उद्योजक अंगद शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार गुजर, युवा उद्योजक संजय दोशी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघाच्या वतीने लेखी निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा यांनी दिले. यामध्ये इंदापूर शहर व परिसरातील व्यापारी बांधवांच्या महत्वाच्या चार मागण्या करण्यात आल्या.
भीमा नदीच्या काठावर असलेली खेडी या इंदापूर शहराला कालठाण-चिकलठाण हा भीमानदीवरील पूल उभारून जोडता येईल व तब्बल तीन जिल्हे इंदापूरला जोडले जातील दळणवळण वाढेल, अशी माहिती देत अध्यक्ष भरत शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
अजित पवार यांनी काही क्षणाचा विलंब न लावता संबंधित विभागाला याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना लगेच दिल्या. येत्या तीन-चार महिन्यात या कामासाठी शासकीय निधी दिला जाईल. असा शब्दच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यामुळे आगामी काळात इंदापूर शहर ही पश्चिम महाराष्ट्राची मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे.